Tuesday, 28 August 2012

आनंद मरते नही ... !!


सकाळी ६ ची गाडी होती .. औरंगाबाद-मुंबई ... रेल्वे चा प्रवास म्हणजे मी आधीच वैतागलेला ... पण "आलीया भोगासी " असे म्हणून प्रवास सुरु केला ... सुरुवातीची १५ २० मिनिटे सगळे प्रवासी "सेट" होण्यात व्यस्त होते .
जसा जसा झुक-गाडीने वेग घेतला तसे तसे लोक आपल्या आपल्या सामानसुमाना सोबत सेट झाले . वर्तमान पत्रांची देवाण घेवाण .. कोण कुठला .. आपण कुठचे .. अशा गप्पा सुरु झाल्या .. काही लोक रात्रीच्या झोपेचा कोटा भरून काढण्यासाठी झोपते झाले .

गाडी आता बरीच पुढे आली होती , एखाद तास झाला असावा . खाद्य पदार्थांची रेलचेल व्हायला लागली होती . आपल्या टिपिकल ढबीने विक्रेते आपले आपले पदार्थ विकण्यात दंग होते. तितक्यात एका माणसाकडे माझे लक्ष गेले. मी त्याला "आनंद" म्हणेन. कपडे अंमळ फाटकेच पण स्वच्छ. हातात एक पिशवी आणि नजर लोकांच्या सीट्स च्या पायाशी भिरभिरती . पण हालचालींमध्ये मुळीच घाई नाही !! आधी मला जरा विचित्र वाटले .. पण मी तसाच त्या माणसाचे निरीक्षण करण्यात दंग झालो. मनात खूप प्रश्न होते , हा चोर असेल का ? का वेडा असेल ? का बरं हा असा सगळ्या सीट च्या पायाशी पाहतोय ? आणि तोंडातल्या तोंडात अस्पष्ट काहीतरी बोलतोय ?

२ मिनिटात तो माणूस बोगीच्या त्या टोकापासून माझ्या टोकाशी येता झाला . माझ्या जवळच तो आता उभा होता , माझी सीट दाराजवळच असल्याने त्याच्या माझ्यात एखाद फुटापेक्षा जास्त अंतर नसावे. मी आपला त्याच्याकडे चोरून पाहत (निरीक्षण) करत होतो. त्याने मला खांद्यावर टोचून विचारले "सर .. बूट-पालीस  ?" .. मी मान हलवली .. मनातल्या मनात हसलो ... माझ्याच मनाने मला किती मूर्ख बनवले होते ? मनाचे हे खेळ नेहमी असेच असतात ...दिसत एक असतं आणि आपलं मन आपल्याला दाखवत एक असतं .

तर ... तो माणूस परत जिथून आला होता त्या दिशेला निघाला .. तितक्यात  कोणीतरी त्याला "ए " अशी हाक मारली .. आणि बसल्या जागेवरूनच चिखलाने माखलेले बूट त्याला दिले. अचानक "आनंद"च्या चेहऱ्यावर एक पुसट हास्य आले .तो परत उलटा फिरून माझ्या सीटच्या मागे येऊन दाराशी बसला , हळूच बूट खाली ठेवले आणि मग "पालीस व्याक्स ब्रश फडकं " अशी अवजारं त्याच्या त्या पिशवी मधून बाहेर काढली. त्याने त्याचं काम सुरु केलं आणि मग मी पण पेपर वाचन वगैरे करण्यात दंग झालो . अंदाजे १० मिनिटांनी लक्ष दाराकडे गेले तर हा अजून ही "पालीस" च करत होता . चेहऱ्यावर एक वेगळंच हास्यं होतं... समाधानी .. आणि शांत हास्यं !! जो बूट अतिशय गचाळ होता तो आता वेगळ्याच रुपात आला होतं ... "एकदम  चक्क " एखाद मिनिटात "आनंद" उठला आणि ज्याचा बूट त्याला दिला . मग पुन्हा एक आवाज .. "ए" .. एक स्मित हास्यं ... आणि परत दाराजवळची  जागा. इत:पर मनमाड आलं होतं .. लोकांची चढ उतर, गर्दी झाली . लोक "आनंद" ला लाथाडून , कुत्सित नजरेने पाहून ये जा करत होते .. चूक दोघांचीही नव्हती .. सगळ्या गोष्टी पोटासाठीच चालल्या होत्या.

आता मला राहवलं नाही .. मनात आत्ता पर्यंत हिशोब करून तयार होता ... ( मनाचा हा एक आणखी चाळा असतो ... मन एकतर स्वप्न रंगवत असतं नाही तर हिशोब दाखवत असतं ) ... दोन तासात २ पालीस ... म्हणजे २० रुपये ... १० तास काम केलं तरी १०० रुपये ... त्यातून गुजराण करायची .. पालीस चे सामान सुमान विकत घ्यायचे ... मग कायद्याच्या रक्षकांना "खुश" ठेवायचं ... आणि उरलंच चुकून काही ... तर मग "पोट" !!
आनंद कडे पाहिलं .... आनंद हसत हसत पालीस करण्यात मग्न ... जणू काही त्याला कशाचंच काही भान नव्ह्तं .. जगात २ सत्य होती .. एक बूट .. आणि दुसरं त्यावर आलेली चमक ... !!

मी त्याला विचारलं " का बरं हसतोयस ? " त्याचं लक्ष नव्हतं .. मी जरा मोठ्याने परत तेच विचारला ... त्याने माझ्याकडे पाहिलं ... एक दोन सेकंद काहीच बोलला नाही ... आणि मग बूट दाखवत म्हणाला " कसं चमकतय ?" .. आणि मी काही म्हणायच्या आत परत आपला पालीस च्या लायी मध्ये आनंद मग्न ! थोड्या वेळात पालीस झालं आणि तो जोड त्याने मूळ मालकाकडे परत नेला ... वाचतांना हसू येईल कदाचित तुम्हाला ... पण त्याच्या चेहऱ्यावरचं हास्य होतं ना .. ते मला एखाद्या बापाने आपल्या मुलाकडे कौतुकाने पहावं किंवा शिक्षकाने आपल्या कर्तृत्ववान शिष्याकडे पहावं तितकं छान , निर्मळ आणि शांत होतं .

आनंद आता बहुदा उतरायच्या तयारीत किंवा दुसर्या डब्यात जाण्याच्या तयारीत असावा ... परत एकदा मी त्याच्याशी बोलायचा प्रयत्न केला .. आणि त्याला एक नोट काढून दिली ... आणि यानंतर त्याने जे उत्तर मला दिलं .. त्या उत्तराने मला माझीच लाज वाटली ... मी त्याला २० रु . देऊ केले आणि म्हणालो खाऊन घेशील काहीतरी ... आनंद म्हणाला " साहेब , तुम्ही रबरी चप्पल घातलीये .. चप्पल को पालीस नही होगा !!"

खरंच मी त्याची दया येऊन त्याला पैसे देत होतो का का "देवा बराय तू मला या स्थितीत ठेवलं नाहीयेस .. त्याबद्दल तुझे धन्यवाद .. म्हणून देवाला "फीस" देत होतो ? आणि त्या "फीस" ला दानाचा आव आणून उगाच दानशूर असल्याचं समाधान लाटत होतो ?.. " उत्तर मला अजून हि मिळालं नाहीये .
नंतर मी बराच वेळ विचार करत होतो ... आपण किती क्षुल्लक कारणाने "डिस्टर्ब" होतो ... आपण कायम रडत असतो ... नाखूष असतो ... स्वताच्या दैवाला आणि ताटात जे वाढून आलाय त्याला नावं ठेवत असतो .. नाकं मुरडत असतो. तीच खरी वेळ असते असे "आनंद" आपल्याला भेटायची !! मग कळतं ... आपण खूप सुखात आहोत !!

एका सिनेमातला डायलॉग मला तेव्हा आठवला .. "कोणतंही काम मी आनंदासाठी करत नाहीं ... आनंदा"नी" करतो !! तेव्हा ठरवलं देवाला काही इतर मागण्यापेक्षा असा "आनंद"च का मागू नये ??


3 comments:

Vrushali said...

भारीच आहे लेख केदार... 'आनंद' मस्तच आहे...

adwait said...

waah !! aawaDala ..

Shabd गौरव said...

>>>> माझ्याच मनाने मला किती मूर्ख बनवले होते ? मनाचे हे खेळ नेहमी असेच असतात ...दिसत एक असतं आणि आपलं मन आपल्याला दाखवत एक असतं
kadak salute !!
ani ho, we have many things that made our life too fine, and while praying to god, still, we whine :(